हरवलेलं घर

छोटयाशा शहरात आमचा चौसोपी वाडा होता.आर्किटेक्ट झाल्यानंतर त्या जागी आम्ही कॉंक्रिटची इमारत बांधली.ती इमारत; घर नव्हे! वाडयात गेलेले बालपण आठवू लागले.आणि स्वत:लाच आपल्यातील वास्तुरचनाकार म्हणून उणीवा जाणवायला लागल्या.आज चाळीसी पार केलेल्या खेडयातल्या किंवा शहरातल्या व्यक्तीलाही कौलारू घराचा अनुभव असेल.कारण आपल्या देशातच मुळी कॉंक्रिट इमारती चंदीगड शहर वसवल्यापासून होऊ लागल्या.ली कार्बुजीअर वास्तुरचनाकाचे ते श्रेय (?) देशातले हे पहिले शहर,जे स्वातंत्र्यानंतर वसवण्यात आले.बदल,फैशन म्हणून वास्तुरचनेत वेगळे ‘मटेरियल’ वापरण्याचा तो प्रयत्न होता.मात्र त्यानंतर देशभरात कॉंक्रिट घरांचा लोंढाच फुटला.त्यात आपली घरे वाहून गेली.खेडयातला चौसोपी वाडा हरवला.कौलारू घर हरवले.शहरीकरणाच्या वाढत्या गरजेतून हे जणू अटळ होऊन गेले.

वाडयातला चौक,जिथे मिलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा होती.वाळवणासाठीचा स्वच्छ सूर्यप्रकाशाचीही ती जागा होती.या वाडयात अडगळीची खोली होती.अगदी बाळंतीणबाईचीही स्वतंत्र खोली असायची.माजघर होते.तिथल्या देवघरातल्या गंद प्रकाशात देव्हारा उजळून निघत होता.घराची प्रकाश रचना यावर आज खूपच बोलले जात; मात्र मुळातच घरातल्या प्रकाशावर घरातील निवांतपणा ठरत असतो.आपण सूर्यप्रकाशात वावरतो तेव्हा आपली बुबळे आंकुचित पावलेली असतात.अंधारात जातो तेव्हा ती प्रसरण पावतात.ही स्थिती मनाला आपसूक निवांतपणा देते.त्यामुळे रात्री अंधाऱ्या खोलीत भुईला पाट टेकते तेव्हा शरीर आणि डोळ्यांना मिळणारा विसावा ब्रह्मानंदी टाळीची अनुभूती देणारा असतो.खरे तर वाचण्यासाठी लागणारा प्रकाश आणि एरवीच्या आपल्या सर्व नैमीत्तिक कामांसाठी लागणारा प्रकाश यातला फरकच आजच्या वास्तुरचनामध्ये नसतो.पूर्वी नकळतपणे हा मेळ साधला जात होता.नव्या जीवनशैलीला घरात प्रशस्त खिडक्यामुळे सर्वच खोल्यांमधील प्रकाश लिहिता-वाचता येईल इतका सर्रास ठेवला जातो.आपल्या जगण्यात अंधाराचाही एक अवकाश आहे.तो घराने दिला पाहिजे.प्रत्येक खोलीच्या गरजेनुरूपच प्रकाश व्यवस्था करायला हवी.वाडा किंवा कौलारु घरांमध्ये हा अवकाश सांभाळला जात होता.वास्तुशास्त्राने आज ब्राह्मस्थान हा शब्द प्रत्येकाला माहित झाला आहे.जुन्या वाडयातील चौक हा ब्राह्मस्थानच होता.घरासाठीची तावदाने आता इतिहासजमा झाली आहेत.अगदी ब्रिटीशकालीन इमारतीमध्ये तावदाने आढळतात.जुन्या घरांमध्ये कौलाजवळील तावदानाद्वारे गरम हवा बाहेर काढण्याचे काम आपोआप होत असे.आता ब्राह्मस्थानाला पर्याय म्हणून वास्तुशास्त्री बऱ्याच काळ गमतीजमती सांगतांना दिसतात.

जुन्या घरात पोतामाळा हमखास असायचा.कौलातून येणारी उष्ण हवा परस्पर रोखण्याचे काम हा माळा करायचा.प्लास्टर ऑफ प्यारीस (पीओपी) मुळे पोटमाळा गायब झाला. कॉंक्रिटच्या घरात ही सोयच नाही.प्रत्येक हवामानाचा पूरक अशी घरांची रचना करणारे शाहण आपण अनुभवाने प्राप्त केले होते.त्यामुळे प्रांतोप्रांतीची-राज्या-राज्यांची घररचना वेगळी होती.एकाच महाराष्ट्रातील कोकण,विदर्भ,मराठवाडा अशा विभागनिहाय घरांचे वेगळेपण आहे.ती त्या त्या हवामानाचा विचार करून बांधली जात होती.

पाश्चात्य प्रगत देशांत आता जैविक इमारत चळवळ (ग्रीन बिल्डींग मुव्हमेंट) जोरात आहे.आपल्याकडे वस्तूबाबत हा विचार परंपरेने चालत आला.पंचतत्वांचा म्हणजे पंचमहाभूतांचा सर्वांगीण दृष्टीकोन बाळगणारे वास्तूशास्त्र खूप खोलवर विचार करणारे.आजच्या धावपळीच्या युगात मात्र आपण त्याचा खोलवरचा खरा विचार करण्यापेक्षा त्याचेही एक कर्मकांड करून टाकले.हे कर्मकांड शोषणाचे आणखी एक निमित्त ठरतेय.हे वास्तूरचनाकार म्हणून काम करताना सतत जाणवतेय.

जुन्या परंपरागत घरांमधील सारेच नव्या जीवनशैलीच्या घरांमध्ये आणता येणार नाही.मात्र त्या घरातले आधुनिक जीवनशैलीच्या घरात काय काय आणू शकू? तसे परंपरेचे पुनरुज्जीवन घर बांधताना प्रत्येक टप्प्यावर करायला हवे.त्यामुळे घराच्या बाबतीत तरी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे नक्की म्हणता येणार नाही.तथापि सावध ऐका पुढल्या हाका’ असे मात्र नक्की म्हणता येईल.

गेल्या फक्त वीस वर्षांतील नागरीकरणाचे नदया,ओढे,डोंगर,जमीन,जंगले यांवरील दुष्परिणाम आपण भोगतो आहोत.पुढच्या युगाची घरे पर्यावरण संवर्धन करणारी ठेवली तरच आपले अस्तित्व असेल.सौरऊर्जेसह विविध नैसर्गिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करणारी ही घरे असतील.याउलट आजची आधुनिक घरे आज केवळ आलिशान निवारे ठरत आहेत.की सभोवतालच्या समाज पर्यावरणाचा विचार करतांना दिसत नाहीत.परंपरा,आधुनिकता यांचा परस्परपूरक मेळ घालणारा निवारा म्हणजे ‘इको ट्रडिशनल इन्व्हलप’ म्हणजे घर असेल.तेच खराखुरा आनंद देऊ शकेल.

जुन्या परंपरागत घरांमधील सारेच नव्या जीवनशैलीच्या घरांमध्ये आणता येणार नाही.मात्र त्या घरातले आधुनिक जीवनशैलीच्या घरात काय काय आणू शकू? तसे परंपरेचे पुनरुज्जीवन घर बांधताना प्रत्येक टप्प्यावर करायला हवे.त्यामुळे घराच्या बाबतीत तरी ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे नक्की म्हणता येणार नाही.तथापि सावध ऐका पुढल्या हाका’ असे मात्र नक्की म्हणता येईल.

गेल्या फक्त वीस वर्षांतील नागरीकरणाचे नदया,ओढे,डोंगर,जमीन,जंगले यांवरील दुष्परिणाम आपण भोगतो आहोत.पुढच्या युगाची घरे पर्यावरण संवर्धन करणारी ठेवली तरच आपले अस्तित्व असेल.सौरऊर्जेसह विविध नैसर्गिक ऊर्जास्त्रोतांचा वापर करणारी ही घरे असतील.याउलट आजची आधुनिक घरे आज केवळ आलिशान निवारे ठरत आहेत.की सभोवतालच्या समाज पर्यावरणाचा विचार करतांना दिसत नाहीत.परंपरा,आधुनिकता यांचा परस्परपूरक मेळ घालणारा निवारा म्हणजे ‘इको ट्रॅडिशनल इन्व्हलप’ म्हणजे घर असेल.तेच खराखुरा आनंद देऊ शकेल

Similar Posts